प्रत्येक क्षणी जगताना मनात सतत काहीना काही चालू असतंच. आजवर मनातलं मनाशीच बोलत होते, पण यापुढे माझ्या मनातलं आपल्या सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा विचार आहे. यात अट एकच...वाचताना मन लावून वाचावे लागेल...अहो नाहीतर 'मनाचे...मनाशी...' पोचणार कसे?
मनात येईल ते मोकळेपणे मी आपल्याशी शेअर करणार आहे. रोजची कामं करताना...कित्येक गोष्टी मनात घोळत राहतात, पण जगण्याच्या ओघात व्यक्त करायच्याच राहून जातात. पण म्हणून त्या नष्ट होत नाहीत, तर मनाच्या तळघरात साठत जातात, मग कधी त्याच्या कविता होतात, कधी सूर होतात, कधी कथा, कधी चित्रही तयार होतात मग याचा ब्लॉग का होऊ नये?
मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात हळूच डोकावून पाहायला आवडणाऱ्यासाठी हा ब्लॉग आहे, बंद खोलीत एकट्यात अश्रू गाळून वरवर हसणाऱ्यासाठी हा ब्लॉग आहे, जगाची फिकीर न करता आपल्याच धुंदीत राहणाऱ्या मस्तवालांचा हा ब्लॉग आहे, इथे यायला कोणालाच पाबंदी नाही.
इथे काय लिहायचे हा विचारच मी केलेला नाही. कारण,तसं काही न ठरवताच लिहण्यात मजा असते.' काहीतरी बरळणारी पोरगी' म्हटलं तरी चालेल, पण हे बरळणे निरर्थक नसेल एवढे नक्की!