Tuesday 6 May 2014


                                     'विहंग'म सहल

एखादा क्षण असा येतो कि वाटतं आयुष्य इथेच थांबावं, जग इथेच संपावं, त्या क्षणापासून पुढे सरकूच नये, कारण एखादा अनुभव इतका सुंदर असतो कि तो गोठवून ठेवावासा वाटतो. माझी ही 'अशी' अवस्था झाली ती गेल्या महिन्यातल्या बारामती जवळच्या कुंभारगावातल्या पक्षी निरीक्षण सहलीत. 

कधी कधी असं होतं बघा, की आपण सहजच म्हणून एखादी गोष्ट करतो, फार गांभीर्याने वगैरे काही करत नाही, आणि अचानक या 'लेट्स ट्राय आउट' च्या सदराखाली मोडणाऱ्या काही गोष्टी अचानकपणे 'उम्मीद से दुगुना' असं काहीतरी देउन जातात. दोन दिवसांच्या कुंभारगाव सहलीच्या बाबतीत माझं तसंच काहीसं झालं. बोलता बोलता एकदा सौरभदादाने या ग्रूप टूरची माहिती दिली, हल्ली कुठे गेले नसल्याने मी पण बोर झाले होते, त्यात हे 'पक्षी निरीक्षण' काहीतरी वेगळं होतं. एका मैत्रिणीला सोबत घेतलं आणि सकाळी ६ वाजता ऐरोली ब्रिजकडे एकदाची बसमध्ये बसले. 

एकूण १८ जणांचा ग्रूप. सर्व अनोळखी होते, पण तेच दोन दिवसांचे 'सोबती' असणार होते! अनोळखी ग्रुपसोबत सहलीला जायची माझी पहिलीच वेळ. हळूहळू ओळख परेड झाली. काका, मावशी, ताई, दादा आणि काही नुसतेच मित्र-मैत्रीण म्हणण्यासारखे मेम्बर्स. डॉक्टर्स, रिटायर्ड मंडळी, कॉलेज स्टुडेंटस, कॉर्पोरेट- एमएनसीज असे वेगवेगळ्या क्षेत्रांतले हे लोक पक्षी बघायला जातात! मला भारीच वाटलं एकदम. म्हटलं चला, आपणसुद्धा बघूनच घेउ पक्षी :) 

दुपारी १ च्या सुमारास कुंभारगाव गाठलं. रखरखीत उन. गावातल्याच संदीप नगरे या स्थानिकाच्या घरी थांबलो. त्यांनी गेल्या गेल्या भाकरी, पिठलं, भाजी, ठेचा, कोशिंबीर अशा अस्सल वैदर्भीय जेवणासोबत ताकाने आमच्या पोटातली आग शांत केली. मग उन ओसरेपर्यंत टाईमपास करून चार वाजता मुख्य मिशन 'पक्षी निरीक्षणाला' उजनी जलाशयात बोटीतून निघालो. बोट साधी, छोटीशी. हळूहळू वल्हवत किनाऱ्यापासून दूर गेलो. संथ जलप्रवाह, त्यावर एका लयीत तरंगणारी आमची बोट, मागच्या किंचित तांबट कॅनव्हासवर अस्ताच्या तयारीला लागलेला सूर्य आणि शांतता अधिक गूढ करणारा तो वल्हवण्याचा आवाज! जादुईच वाटलं एकदम. 'ओ माजी रे' असं काहीतरी मनात येत होतं, पण फार फिल्मी झालं असतं ना… 

दूर बसलेला शुभ्र पक्ष्यांचा थवा नजरेच्या टप्प्यात आला. तेव्हा उगाचच एक्साईट वगैरे झाल्यासारखं वाटलं. आयला, मला कधीपासून पक्षी आवडायला लागले! 'असो' म्हणत मी पक्षी आणि बोटीतल्या माझ्या 'सोबत्यांच्या' हालचाली निरखत होते. बोटीत दोनजण कॅमेराधारी होते. पहिली दहा- पंधरा मिनिटं 'हे लोक काय त्या पक्ष्यांमध्ये इतकं आवडीने पाहतात' या विचारात पडले. एवढ्यात एक फ्लेमिंगो आमच्या अगदी डोक्यावरून, फार जवळून 'क्य क्य' आवाज करत उडत गेला. त्याचे पूर्ण पसरेलेल पंख, त्यावरील लाल रंग, त्याची ताठ-स्थिर मान कितीतरी वेळ पाहत बसले, तो ठीपक्याएवढा होईपर्यंत. काहीतरी वेगळं दिसत होतं, दिसणार होतं याची कल्पना आली. मग बोटीत बसून, मान शक्य तेवढ्या अंशात फिरवून असे असंख्य थवे डोळ्यांनी हेरण्याचा प्रयत्न केला.  कॅमेराधारींना ' ए इकडे बघ- तिकडे बघ' सांगून 'डायरेक्शन' द्यायलाही सुरुवात केली.  किनाऱ्यावरून निघताना मनात रुंजी घालणारे प्रश्न बहुधा किनाऱ्यावरच राहिले होते. पाहता पाहता मन खूप प्रसन्न झालं होतं, खूप शांत वाटत होतं.  


 
'दिल मांगे मोअर' म्हणत कॅमेराधारींनी गुडघाभर पाण्यात उदड्या मारल्या. दूर बसलेल्या थव्यांना टिपण्यासाठी ते काही अंतरावर गेले आणि सौरभदादाने एकदम टाळ्या वाजवल्या. धोक्याची सूचना लक्षात घेऊन ते जवजवळ हजारच्या घरात असलेले पक्षी थव्याथव्याने उडू लागले. एका क्षणात आसमंत असंख्य 'बगळ्यांच्या माळांनी' भरून गेला. त्यांची 'क्य क्य' अशी साद, पसरलेले पंख, आकर्षक रंग, डौल…  कुठे पाहू कुठे नको असं झालं. 'आनंद ओसंडून वाहणे' या वाक्प्रचाराचा प्रत्यय आला. सगळं मनात साठवून आम्ही बोट किनाऱ्याच्या दिशेने वळवली. पण 'पिक्चर अभी बाकी था मेरे दोस्त' कारण आम्ही निघतानाच बोटीतून मेलेले मासे आणले होते. ते थोडे थोडे पाण्यात भिरकवायला सुरुवात केली. सुरुवातीला कुणीच पक्षी आमच्या खाद्याला भाव देईना, पण मग एक-दोघा चाणाक्ष पक्ष्यांनी खाद्य हेरलं आणि ते पाण्याच्या पृष्ठभागावर झेपावून मासे टिपू लागले. त्यांना पाहून मग थवेच्या थवे आमच्या बोटीच्या दिशेने झेपावले. तो अनोखा नजारा नजरेत साठवायला कॅमेराच काय डोळेही अपुरे पडत होते. उडत येणारा पक्षी पंख फडफडवत पाण्यावर झेपावतो आणि ज्या हुशारीने नेमका पाण्यात सोडलेला मासा आपल्या चोचीने टिपतो ते पाहताना नकळतच निसर्गाच्या किमयेसमोर आपण नतमस्तक होतो. 

खाद्यजत्रा उरकली तोवर पाणी लाल-नीळ झाल होतं आणि कॅनव्हासवरचा गोळा गडद लाल झाला होता. मला तर आता किनाऱ्यावर परतूच नये असं वाटत होतं. तसं नावाड्याला सांगितलंही. त्यावर त्याने थोडा वेळ वल्हव बाजूला ठेवले आणि आमची बोट काही काळ एखाद्या ध्यानस्थ योग्याप्रमाणे लाल- निळ्या पाण्यावर निपचित तरंगत ठेवली. मला तर बोटीत मस्त हात-पाय पसरून अथांग आभाळाकडे नजर खिळवाविशी वाटत होती. पण सहप्रवाशांचा विचार केला आणि रसिकतेला जरा आवर घातला ;)  बसल्याच जागी एक समाधी लागली, निसर्गाचं सौंदर्य, त्याचं औदार्य, त्याची सगळीच मोहमयी रूपं मुरत गेली मनात, अगदी खोल…  आत. शब्द आटले आणि मूक संवाद सुरू झाला त्या आदी शक्तीशी.  खूप वेळ तंद्री लागली. मग लक्षात आलं कुणीच काहीच बोलत नव्हतं. वातावरणात असीम प्रसन्न शांतता भरून राहिली. शेवटी नावाड्यानेच वल्हव हातात घेतला आणि बोट किनार्याच्या दिशेने सरकू लागली. 



 दुसर्या दिवशी पहाटे हाच अनुभव आला. पण अर्थात तेव्हा कॅनव्हासवर सूर्योदयाच्या रंगच्छटा होत्या आणि उगवत्या सूर्याचं सुंदर रुपडं खुणावत होतं. पुन्हा तेच पक्षी, ती साद, ती मोहक हालचाल, खाद्यजत्रा, कॅमेराधारींची लगबग आणि परततानाची ती तंद्री. हा पण, परतताना तेवढंच नव्हतं. हातातून काहीतरी निसटत असल्याची एक तीव्र जाणीव होत होती. खूप काही निसटलंय आणि निसटत असतं आपल्या सर्वांच्याच हातून. 

नेमकं काय मिळतं अशा अनुभवांतून ते असं शब्दांत नाहीच सांगता येत. ते अनुभवायचं असतं, आत जिरवायचं असतं आणि कायम मनात जपायचं असतं. फार दूर नसलेलं, पण काहीसं आड वळणाचं कुंभारगाव, उजनी नदीचं पात्र, त्यावर आसमंतात गोंदलेला तो 'मित्र' आणि ज्यांच्याशी नव्यानेच मैत्री जुळली ते मुक्त- मनोहर विहंग… जियो यार जियो… तुम्हाला पाहायला मी पुन्हा येणार आणि पुन्हा पुन्हा येतच राहणार :)   
     
-अनुजा 
छायाचित्र : सौरभ महाडिक


Saturday 27 April 2013



वृद्ध नव्हे समृद्ध!

नमस्कार. सु/कुप्रसिद्ध (?) कुंभमेळ्यात आपलं कारटं हरवावं आणि मग अचानक एखाद्या दिवशी अचानक गवसावं तसं माझं या ब्लॉगच्या बाबतीत झालंय, तब्बलं दोन वर्षांनी पुन्हा एकदा ब्लॉग लिहितेय!

एवढी प्रस्तावना पुरेशी आहे. आता डायरेक्ट मुद्द्यावर येते. दोन दिवसांपूर्वी मी घरी आईवडिलांना एक प्रश्न विचारला. तो असा, सिंगल आजोबा आणि सिंगल आजी एखाद्या वृद्धाश्रमात एकमेकांच्या प्रेमात पडले तर त्यांनी सहजीवन जगावं का? अर्थात या अनपेक्षित प्रश्नाने त्यांचा गोंधळ उडाला. उत्तर आलं, हो चालेल ना. त्यात काय? अचानक असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस वृद्धाश्रमावर आधारित एका पुस्तकाच्या कामाच्या निमित्ताने जोरात विचारमंथन सुरू आहे.
वृद्धाश्रमाचे काही फायदे आहेत तर काही तोटे. पण पार्टनर वारल्याने, लग्नच न केल्याने किंवा घटस्फोट झाल्याने एकटे असलेल्या वृद्धांसाठी (आजी/आजोबा) वृद्धाश्रम हा पर्याय आपल्या भाषेत सांगायचं तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखा असू शकतो, हा एक खूप मोठा फायदा आहे. या वयात एकट्या असलेल्या आजी/आजोबांभोवती मुलं, सुना, नातवंड यांचा मोठा गोतावळा असतो. समवयस्क मित्रांच्या/मैत्रीणींच्या भेटी-गाठीही होत असतात, पण तरी एकटेपणा पूर्णत: दूर होऊ शकत नाही. आयुष्यभर ज्याच्यासोबत जगलो त्या सहचार्याची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. शिवाय या वयात पुन्हा लग्न करण्याचाही कोणीच विचार करत नाही. पण म्हणून आजी/आजोबांनी उरलेलं आयुष्य एकट्याने कुढत जगणं मला पटत नाही. प्रत्येकालाच एका हळूवार मैत्रीची गरज असते. समलिंगी व्यक्ती कितीही चांगली मित्र/मैत्रीण असली तरी मनाचे काही कोपरे कायम रिकामीच राहतात जे केवळ भिन्नलिंगी व्यक्तीशी असलेली मैत्रीच भरून काढू शकते यावर माझा ठाम विश्वास आहे. या दृष्टीने आजीला एखादे आजोबा मित्र आणि आजोबांना एखादी आजी मैत्रीण म्हणून गवसायला हवी. पण आज किती वृद्ध अशा प्रकारची मैत्री खुल्या मनाने, ‘लोक काय म्हणतील’ चा बागुलबुवा दूर करून स्वीकारू शकतील? जरी त्यांनी स्वीकारली, तरी त्यांची मुलं असलेले आपले आई-वडील, आणि त्यांची नातवंड म्हणजे आपण हे स्वीकारू शकू?

मला खात्री आहे की, बरेच जण याला ‘म्हातारचळ’ म्हणून आजी-आजोबांना दूषणं देतील. कारण, आपल्या घरात राहात असलेल्या आजी-आजोबांना वर्षानुवर्ष समाजाच्या चौकटीत बांधून घ्यायची सवयच झालेली असते, आणि ते सुद्धा कायम स्वत:कडे ‘मुलं, नातवंड आपल्याकडे कसे पाहातील’ या चष्म्यातूनच पाहात असतात. पण किमान म्हातारवयातील एकटेपण आल्यावर तरी हा चष्मा त्यांनी उतरवायला हवा, त्यासाठी नवीन पिढीने त्यांना मदत केली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. आयुष्यभर कुटुंबासाठी झटल्यावर आता काही काळ त्यांनी स्वत:साठी जगण्यात काय गैर आहे?

वृद्धाश्रमात हे सर्व अगदी सहज जुळून येतं आणि म्हणूनच एकट्या वृद्धासाठी घरापेक्षा वृद्धाश्रम हे अधिक उब देणारं ठिकाण आहे. इथे सगळेच वृद्ध एकत्र येतात, आपले विचार, सुख-दु:खं, जगणं आणि मरणंही शेअर करतात. या वयातही त्यांच्यात मैत्री फुलते आणि मुख्य म्हणजे ती अखेरच्या श्वासापर्यंत टिकते! अनेकदा काही उत्साही आजी-आजोबा सामाजिक कार्यांमध्ये सक्रीय होतात कारण वृद्धाश्रमात आयताच ग्रूप तयार झालेला असतो. याच वातावरणात त्यांना आपल्याशी विचार जुळणारी, काळजी घेणारी आणि जिची काळजी घ्यावी अशी एखादी व्यक्ती भेटू शकते जी आधीच्या सहचारी/ सहचारिणीची जागा तर घेऊ शकत नाही पण किमान आयुष्यातील ते ‘विशेष’ स्थान नक्कीच काही प्रमाणात भरून काढू शकते. एकटेपणावर यापेक्षा चांगला उतारा असू शकतो?

‘पितृ देवो भव, मातृ देवो भव’ असे संस्कार झालेल्या आपल्या भारतीय संस्कृतीला वृद्धाश्रमाचा हा पर्याय सहजासहजी पचणारा नाही. पण हे झाले आपले दाखवायचे दात! सध्या बहुतेक घरांमध्ये असलेली वृद्धांची शारीरीक, मानसिक आणि मुख्य म्हणजे भावनिक स्थिती पाहता आता वृद्धाश्रम या पर्यायाकडे थोडं सकारात्मकतेने आणि तटस्थपणे पाहण्याची गरज आहे. समजा, वृद्धाश्रम हा पर्याय फार टोकाचा वाटत असेल तर आजी-आजोबांना घरच्या घरी ठेवून, आपल्या आणि त्यांच्या जीवनशैलीत, विचारांत काही छोटे बदल करूनही त्यांचं वृद्धत्व आनंदी करू शकतो.

माझ्या ओळखीचे एक आजोबा आहेत. त्यांचा नातू माझा चांगला मित्र. अनेक वर्ष अंथरुणाला खिळलेली त्याची आजी वारली, त्यामुळे आजोबा एकदम एकाकी झाले. काही दिवस नातेवाईकांचा गोतावळा सोबत होता, पण नंतर त्यांची चिडचिड वाढली. सतत आरडा-ओरड करायचे, कोणत्याही गोष्टीवर नकारात्मक प्रतिक्रियाच द्यायचे. माझ्या मित्राच्या लक्षात आलं की त्यांचा एकटेपणा हे यामागचं मूळ कारण असावं. आम्ही काही मित्र-मैत्रीणींनी मिळून यावर एक वेगळाच तोडगा काढला. त्याला सुचवलं की, आजोबांना एखाद्या बागेत घेऊन फिरायला जा. तिथे मुद्दाम त्यांच्या समवयस्कांशी ओळख करून दे. खास करून एखाद्या आजींशी. (अर्थात ही आजी सुद्धा अशीच एकाकी होती) त्याने हे सर्व मनावर घेऊन केलं आणि हळूहळू आजोबांच्या स्वभावात सकारात्मक बदल दिसू लागला. त्यांना भेटणार्या प्रत्येक माणसाला तो प्रकर्षाने जाणवू लागला. त्या आजींशी झालेली ओळख आजोबांच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडवणारी ठरली. दोघांचंही एकमेकांकडे येणं-जाणं सुरू झालं. दोन्ही कुटुंबं फार मोकळ्या मानसिकतेची असल्याने त्यांच्यावर टीका झाली नाही. उलट या वयात या दोघांचीही भावनिक गरज ओळखून या कुटुंबांनी दोघांची मैत्री अधिकाधिक फुलेल यासाठी प्रयत्न केले. आजही हे आजी-आजोबा मनातील आपल्या गत सहचार्याचे स्थान जोपासतानाच एका नवीन नात्याचा आनंद घेत आहेत.

आजी-आजोबा, आई-बाबा सगळे आपलेच, तेव्हा आपण सर्वांनी आपल्यासाठी जगावं, की समाजनियम सांभाळण्यासाठी हे ज्याचं त्याने ठरवावं.

-अनुजा
      
       

Saturday 21 May 2011

मनाचे...मनाशी...

प्रत्येक क्षणी जगताना मनात सतत काहीना काही चालू असतंच. आजवर मनातलं मनाशीच बोलत होते, पण यापुढे माझ्या मनातलं आपल्या सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा विचार आहे. यात अट एकच...वाचताना मन लावून वाचावे लागेल...अहो नाहीतर 'मनाचे...मनाशी...' पोचणार कसे?
मनात येईल ते मोकळेपणे मी आपल्याशी शेअर करणार आहे. रोजची कामं करताना...कित्येक गोष्टी मनात घोळत राहतात, पण जगण्याच्या ओघात व्यक्त करायच्याच राहून जातात. पण म्हणून त्या नष्ट होत नाहीत, तर मनाच्या तळघरात साठत जातात, मग कधी त्याच्या कविता होतात, कधी सूर होतात, कधी कथा, कधी चित्रही तयार होतात मग याचा ब्लॉग का होऊ नये?
 
मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात हळूच  डोकावून पाहायला आवडणाऱ्यासाठी हा ब्लॉग आहे, बंद खोलीत एकट्यात अश्रू गाळून वरवर हसणाऱ्यासाठी हा ब्लॉग आहे, जगाची फिकीर न करता आपल्याच धुंदीत राहणाऱ्या मस्तवालांचा हा ब्लॉग आहे, इथे यायला कोणालाच पाबंदी नाही.
इथे काय लिहायचे हा विचारच मी केलेला नाही. कारण,तसं काही न ठरवताच लिहण्यात मजा असते.' काहीतरी बरळणारी पोरगी' म्हटलं तरी चालेल, पण हे बरळणे निरर्थक नसेल एवढे नक्की!